Wednesday, September 6, 2023

Post from Sai – The Guiding Spirit“

हरि ओम.
पूज्य समीरदादा ह्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच आपले सर्वांचे लाडके आद्यपिपा श्री सुरेशचंद्रसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या लिहीलेल्या काही सुमधुर आठवणी आज वाचनात आल्या .
 बहुधा 15 ऑगस्ट  2012 मध्ये नवीन फोरम  “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).  सुरू करताना लिहील्या असाव्या त्याच  येथे शेअर करीत आहे. 

समीरदादा , आम्ही खूप अंबज्ञ आहोत की आपण  आम्हां सर्वांना ही अमूल्य देणगी दिली.

आज श्रीकृष्णजयंती म्हणजेच 
परमपूज्य आद्य पिपा ह्यांचा महानिर्वाणदिन. 
त्यानिमित्ताने...
पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाची
तुला तुझे देतानाही भरुनी मीच राही...
आम्हां सर्वांची हीच भाव पुष्पांजली. 

आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.

काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी दिवा बंद केला की कधी कधी पुन्हा लावायला सांगायचे. साईनाथांचं दर्शन घेताना त्यांना समाधान व्हायचं नाही. असं ब-याचदा घडायचं. मला वाटायचं रोजचा “तोच, तोच” फोटो बघतानाही त्यांना असं का करायला लागतं? आता त्या गोष्टी कळतात. हाच तो फोटो जो काकांच्या वडिलांनी साईनाथांचा हात लावून घेतला होता; जो आमच्या ठाण्याच्या घरी, घर झाल्यापासून म्हणजे १९६६ पासून लावलेला होता.

जेव्हा काकांच्या निर्वाणाचा दिवस जवळ आला तेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) तो फोटो ठाण्याहून मागवून घेतला व काकांच्या खोलीत त्यांच्या समोर लावला. काका जे समजायचे ते समजून चुकले, त्यांना अत्यंत आनंद झाला. फोटो बघून ते एवढे गहिवरले की त्यांना त्यांचे अश्रू आवरताच येईनात. निर्वाणाच्या आदल्या दिवशी काकांनी माझ्यासमोर बापूंना (अनिरुद्धसिंह) विचारलं की “बापू अजून किती दिवस?” त्या वेळेस पहाटे बापूंनी (अनिरुद्धसिंह) माझ्यासमोर काकांना सांगितले की “आता काही तासच उरले आहेत.” तेव्हा काकांनी अत्यंत समाधानाने माझा हात बापूंच्या (अनिरुद्धसिंह) हातात दिला; ही माझ्याकरिता काकांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट होती.

काकांच्या नित्य पठणातील स्वत:ची श्रीसाईसच्चरिताची पोथी

काकांनी वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९४५ साली श्रीसाईसच्चरिताचे दरवर्षी कमीतकमी चार सप्ताह करण्याचा संकल्प केला. श्रीसाईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा या दिवशी सप्ताहाची सांगता व्हायची. मला आठवतंय.

जया मनी स्वहितविचार l तेणें हा ग्रंथ वाचावा साचार l

जन्मोंजन्मीं साईंचे उपकार l आनंदनिर्भर आठवील ll 

या गुरुपौर्णिमा गोकुळअष्टमी l पुण्यतिथी रामनवमी 

l या साईंच्या उत्सवी नियमीं l ग्रंथ निजधामीं वाचावा ll

काही वर्षं तर काकांनी सप्ताह (श्रीसाईसच्चरिताचे पारायण) शिरडीला द्वारकामाईत कोळंब्याच्या बाजूच्या भिंतीला टेकून केलेला होता. आम्ही सर्व म्हणजे आई, दादा व मी त्यांच्या पठणाच्या वेळेस त्यांच्या बाजूला बसलेले असायचो. तो काळ साधारण १९७० ते १९७५चा होता. त्यानंतर मात्र शिरडीत येणार्‍या साईभक्तांची संख्या खूपच वाढू लागली व पूर्ण सप्ताह तिथे बसून करणं अशक्य होऊ लागलं. त्यानंतर मात्र जसं शक्य होईल तसं मोजके अध्याय काका द्वारकामाईत बसून वाचायचे. अजूनही ते पठण माझ्या कानात घुमतंय. मला श्रीसाईसच्चरिताची गोडी लागली ती काकांच्या या पारायणामुळे व नित्य पठणामुळे. साईनाथांच्या, बाबांच्या या शिरडीशी अशा प्रकारे आमची नाळ बांधली गेली. वर्षातून कमीतकमी दोनदा तरी आमची शिरडीची वारी व्हायचीच.

श्रीसाईसच्चरितातील ३५व्या अध्यायातील २१८ ते २२२ ह्या ओव्या त्यांच्या खूपच आवडीच्या होत्या.

हा सच्चरित मार्ग धोपट । जेथें जेथें याचा पाठ |

तेथेंच द्वारकामाईचा मठ | साईही प्रकट निश्चयें ।।

तेथेंच गोदावरीचें तट । तेथेंच शिरडी क्षेत्र निकट ।

तेथेंच साई धुनीसकट । स्मरतां संकट निवारी ॥

जेथें साईचरित्रपठण । तेथें सदैव साईनिवसन ।

श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ।।

स्मरतां साई स्वानंदघन । जपतां तन्नाम अनुदिन ।

नलगे इतर जपतप-साधन । धारणाध्यान खटपट ॥

साईचरणीं ठेवूनि प्रीती । जे जे या साईंची विभूती ।

नित्यनेमें सेविती लाविती । ते ते पावती मनेप्सित ॥

आणि ह्या ओव्या काका अक्षरश: जगले.

काका “श्रीसाईस्तवन मंजिरी”देखील अतिशय सुंदर म्हणायचे. दादाला व मला त्यांनीच श्रीसाईस्तवन मंजिरी म्हणण्यास सांगितले होते; व आमच्या नित्य पठणात इतर स्तोत्रांबरोबरच ह्याही स्तोत्रांचे पठण होते.

१३ नोव्हेंबर २०००ला बापूंनी (अनिरुद्धसिंह) काकांची पिपिलीका पांथस्थ पदावर नियुक्ती केली. तेव्हापासून काकांचा एक वेगळाच आध्यात्मिक प्रवास चालू झाला. काका खूप शांत झाले. २००४ साली बापूंच्या (अनिरुद्धसिंह) सांगण्यावरून त्यांनी मला गुरुमंत्र दिला; तीही श्रीसाईसच्चरिताचीच ओवी (११वा अध्याय, ओवी १५२)

पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंतीं पूर्ण निष्काम ।

पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ।

सगळ्या श्रद्धावान बापूभक्तांचं ह्या “श्रीसाईसच्चरिताशी” एक विशेष आणि दृढ नातं आहे. बापूंनी  (अनिरुद्धसिंह) श्रीसाईसच्चरितातील पंचशील परीक्षा चालू केल्या, त्याही “श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनीच्या” माध्यमातून. प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही बापूंनी (अनिरुद्धसिंह) घेतली व ती लेक्चर्स संकलित करून श्रीसाईसच्चरिताचं प्रॅक्टिकल बुक तयार झालं; हजारो श्रद्धावान ह्या परीक्षेला बसले. १९९६ साली पहिली रसयात्रा झाली तीही शिरडीचीच; त्या वेळेला हजर असलेल्या श्रद्धावानांना बापूंनी (अनिरुद्धसिंह) साई आणि शिरडी समजावून सांगितले. आता तर बापूंची (अनिरुद्धसिंह) हिंदीतील प्रवचनंही चालू आहेत तीही श्रीसाईसच्चरितावरच. म्हणूनच आपण या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या साईसच्चरितावरील फोरम चालू करत आहोत; बुधवार, १५ ऑगस्ट २०१२ या दिवसापासून आणि फोरमचं नाव असेल “साई – द गाईडींग स्पिरीट (“Sai – The Guiding Spirit“).

-- पूज्य समीरदादांच्या ब्लॉग वरील माहिती संकलन ह्यातून

No comments:

Post a Comment