Sunday, September 5, 2021

Gurushetram mantra

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१७.०५.२०१२)
॥ हरी ॐ॥

ॐ मंत्राय नम:... श्री गुरुक्षेत्रम्‌ मंत्र आपण बघत आहोत. ॐ ऎं ‍ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे त्रिविक्रमनिलयं श्री गुरुक्षेत्रम्‌ ह्यानंतर पद येते... ॐ ऎं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं श्री गुरुक्षेत्रम्‌.

त्रिविक्रमनिलयं संपलेले नाही आहे पण ते समजण्याआधी ५ व्या पदाला जाणॆ आवश्यक आहे. पहिल्यांदा आपल्याला गुरुक्षेत्रम्‌ समजून घ्यायला हवे.

चण्डिकाकुलाची जिथे एकत्रित प्रार्थना मिळते ती जागा म्हणजे गुरुक्षेत्रम्. बापूंनी सांगितले तिथे धर्मासन, माता अनसुयेची तसबीर, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे... अमुक अमुक आहे ते म्हणजे गुरुक्षेत्रम्‌.
आज प्रथम गुरुक्षेत्रम्‌विषयी जाणून घेऊया. गुरुक्षेत्रम्‌ हे गुरु आणि क्षेत्रम्‌ ह्या दोन शब्दांनी बनले आहे.

गुरु म्हणजे काय? शाळेत आपल्याला शिक्षक शिकवतो. त्यांना आपण गुरुच म्हणतो. वेगवेगळे बुवा, महाराज असतात, जे प्रवचन देतात, चमत्कार करुन दाखवतात त्यांनाही आपण महागुरु, सद्गुरु म्हणतो.

गुरुब्रम्हा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुरेव परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नम:

गुरु नक्की काय प्रकार आहे?

जगातील सर्वात श्रेष्ठ मंत्र काय तर गुरु हा शब्द.

आपल्याला इथे analysis नाही करायचे आहे तर आपल्या नित्याच्या जीवनात दु:ख कमी करण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी, आनंद देण्यासाठी, पुढील जन्माची चांगली सोय करण्यासाठी आपल्याला गुरू हे आवश्यक तेवढे तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे आहे .

इथे एवढ्या स्त्रिया बसल्या आहेत. त्या सर्वांना भात बनवता येतो... येतो ना? हो तरी म्हणा.. येतो बरोबर पण समजा मी इथे तुम्हांला तांदूळ दिले आणि सांगितले भात बनवा तर बनवता येईल का ?
त्यासाठी काय लागेल? ... समजा भात बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शेगडी, तांदूळ, माचिस, पाणी सगळे दिले मग भात बनवता येईल का? ( सगळे हो म्हणतात ).. हो! उत्तर चूक आहे. तांदूळ कशापासून बनतो? भातशेतीमधून, जेव्हा तांदूळ हा त्या टरफलासहीत असतो तेव्हा त्यालाही भात म्हणतात... मग त्यापासून वरील सर्व साहित्य दिल्यावर भात बनवता येईल का?  नाही म्हणजे एकच शब्द पण दोन अर्थ ह्यासाठी त्यामागील अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे .

शीव शब्द आहे ह्याचा एक अर्थ परमशिव तर दुसरा अर्थ शिव म्हणजे स्पर्श, ह्याच्या र्‍हस्व दीर्घात फरक केला की शिव म्हणजे सीमा. हे आपल्या रोजच्या वापरातील शब्द आहेत म्हणजेच एकाच शब्दाचे ४ -५ अर्थ असतात असे असूनही एखादा शब्द उच्चारल्यावर समोरच्या व्यक्तीला त्यातील तिथे जो योग्य अर्थ तो आपोआप कळतो ना!!

तुम्हांला शाळेत असे शिकवले जाते का? की शिवाचा इथे अर्थ हा तर इथे असा... नाही. मग हे आपण कुठुन शिकतो तर अनुभवातून.
समजा लहान मुलाला "मी" म्हणायला शिकवायचे आहे तर ते कसे शिकवावे लागणार... तू म्हणजे मी बरोबर असे शिकवता येते का? पण तेच आई जे त्या बाळाला सोन्या, बाब्या करत बोलते ते लहान मूल आपोआप शिकते.

प्रत्येक गोष्ट कशी असते हे जरी पुस्तकात, ग्रंथात दिले असले तरी ते केवळ अनुभवातूनच शिकता येते.
पुस्तकात आपण शिकलेलो असतो डांबराच्या रस्त्यावरून भरउन्हात चप्पल न घालता चालले तर पायाला चटके बसतात... हे परीक्षेत लिहून तुम्ही चांगल्या मार्काने पास पण झालात पण जर कधी असे खरोखर उन्हात भर दुपारी डांबराच्या रस्त्यावरुन चप्पल न घालता चालायची वेळ आली तर त्या पुस्तकात शिकलेल्या गोष्टीचा खरा अनुभव येतो.
अरे संसार..संसार.. आधी हाताला चटके मग मिळते भाकर..

ह्याचा अर्थ हा का? भाकर देण्याआधी हाताला चटका द्यायचा... नाही म्हणजेच एकाच वाक्याचे विरुद्ध अर्थ लावून विनोद किंवा संशय निर्माण होतो. मग ह्यातले खरं काय हे कसे ओळखायचे?
चित्रामध्ये आपण बघतो साप किती सुंदर दिसतात.. त्यांचा स्पर्शदेखील थंड असतो हे आपल्याला वाचून माहीत असते. पण भर उन्हात तुम्हांला उकडते आहे... पायाला चटके बसत आहेत आणि त्याच रस्त्यात १००- २०० साप आहेत तर त्यांचा स्पर्श थंड असतो म्हणून त्यांच्यावरून तुम्ही चालत जाणार का?
साप चित्रात कितीही सुंदर दिसत असला तरी तो विषारी की बिनविषारी हे आम्हांला ओळखता कुठे येते आणि ते ऒळखायच्या खुणा माहीत जरी असल्या तरी त्या आठवेपर्यंत साप चावायचा तसाच थांबणार आहे का ?

म्हणजेच एखादी गोष्ट आपण पुस्तकात शिकतो पण ती आपल्याला अनुभवातूनच खरी समजत असते.
इथे किती दहावी पास आहेत? अरे हात तरी वर करा... मला सांगा दहावीच्या अभ्यासाला किती महत्त्व असते. पण हाच दहावी झालेला विद्यार्थी जीवनात वेगवेगळ्या प्रंसंगी नंतर किती समर्थ असतो .
किती जण इथे Bsc, Msc असतील; त्यांनी physics chemistry वाचलच ना पण आमच्या लक्षात राहते का?
आपण सोने विकत घेताना त्यात किती molecules आहेत ते बघून घेतो का? नाही तिथे आपण खिशाचे वजन किती आहे ते बघतो.
सर्वसामान्य जीवनात भानावर असणे व जाणणे हे अतिशय महत्त्वाचे आहे .

भानावर असल्याशिवाय जाणून घेता येत नाही व जाणून घेतल्याशिवाय भानावर रहता येत नाही. उदा. तुम्ही रस्त्यावरुन जात आहात व तुम्हाला माहीत आहे तिथे साप आहे तेव्हा तुम्ही भानावर असता जर तिथे साप आहे ह्याची जाणीव नसेल तर तुम्ही भानावर राहू शकणार नाही .
इथे परत कोंबडी आधी की अंडं आधी हा प्रश्न येतो आणि हा प्रश्न माणसाच्या जीवनात कधीच सुटत नाही.
भानावरही असणे व जाणतेही राहणे ही कसरत मनुष्य आयुष्यभर करत राहतो...

बर्‍याच स्त्रिया नेहमी म्हणतात आम्ही उरलं-सुरलं खाऊ... पण हे उरलं सुरलं म्हणजे किती ह्याचा हिशोब नसतो .

हल्ली जेवताना आम्ही काय करतो आपल्याला जे हवे असेल ते ताटात वाढून घेतो आणि सासू-सुनेच्या भांडण्याच्या व हाणामारीच्या मालिका बघत T.V समोर बसतो .
त्याऎवजी जर घरात सर्व स्त्रिया एकत्र बसल्या... एकमेकींशी गप्पा मारल्या  तर किती चांगले होईल पण असं होत नाही कारण आंम्हाला त्याची गरज वाटत नाही. 
आणि ह्या गोष्टीला अपवाद नाही.

मनुष्य नेहमी जशी गरज वाटते त्याप्रमाणे वागत असतो. गरज पडली की तुम्ही कृती करणार म्हणजे काय?

तर अशी गरज येऊ शकते ह्याची मला जाणीव नसणे ... अशी गरज मला निर्माण होईल ह्याचे मला भान नसणे.
आपण आज हे इथे नीट समजून घ्यायचे आहे कारण माणसाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा हा विषय चालू आहे.

माणसाची ही गरजच प्रत्येक गोष्ट ठरवत असते. ह्या गरजेशिवाय कुठलीही गोष्ट घडत नसते.
प्रत्येक मनुष्याला जशी गरज असते तशी त्याच्याकडून क्रिया घडत असते.
ही गोष्ट लहानातल्या लहान व मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत माणसाने लक्षात ठेवली पाहीजे .

एखादी व्यक्ती तुमच्याशी चांगले का वागते? कारण तिची ती गरज आहे म्हणून जेव्हा त्या व्यक्तीची गरज संपते तेव्हा त्या व्यक्तीची तुमच्याशी चांगले वागण्याची जबाबदारी संपते.
तसेच एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट का वागते कारण ती तिची गरज संपली म्हणून.
प्रत्येक माणसाला मी काहीतरी चांगले वागतो असे मनाला वाटणे ही त्याची गरज असते. मोठे गुंड देवळे धर्मशाळा का बांधतात? कारण मी काही तरी चांगले करतोय असे वाटण्याची त्यांच्या मनाची गरज असते.

मनुष्याच्या गरजेमधूनच सगळ्या क्रिया उत्पन्न होत असतात. तुम्ही ज्या घरात राहता त्या घराची पण एक गरज असते. 

म्हणजे काय? तुम्हांला काय वाटते फक्त माणसालाच मन असते का?  हे चूक आहे. प्रत्येक निर्जीव वस्तुलाही मन असते कारण तिथे प्रोटॉन्स असतात... म्हणजेच महाप्राणाचे अस्तित्व असते,

जेव्हा घर बांधले जाते तेव्हा ते घर कोण बांधतो आहे? त्याच्या मनानुसार, ती बांधताना असणार्‍या कामगारांच्या मनानुसार, त्या घरात राहणार्‍या माणसांच्या मनानुसार त्या त्या घराचे मन बनत असते.
तीस वर्षे एक व्यक्ती एखाद्या घरात राहिली आहे आणि ते घर त्या व्यक्तीने सोडून तिथे जर नवीन व्यक्ती रहायला आली तर आपण म्हणतो घर मानवल नाही अस काही नसते.. कारण एकच असते की त्या घराला जे मन आहे जे त्या आधीच्या ३० वर्षे राहिलेल्या व्यक्ति नुसार घडलेले असते, त्याला पुन्हा नवीन व्यक्तीनुसार घडायला थोडा वेळ लागतो.

कारण त्या घरालाही मन असते. ह्याचा अर्थ हा नाही की समोर साप आहे मग त्यालासुद्धा मन आहे म्हणून त्याला गोंजारायचे येऊन चाव म्हणायचे... हे मंदबुद्धीचे लक्षण आहे .
असं का? आपण घराचे उदाहरण बघितले... जोपर्यंत घर उभे असते तोपर्यंतच त्या घराला मन असते .
जर तेच घर पाडले गेले तर त्या घराचे मनही नष्ट होते. लय पावते.

सर्व निर्जीव वस्तूंमध्ये मन असते अगदी मॅचबॉक्सच्या काडीलाही. पण जेव्हा ती काडी जळून जाते तेव्हा तिचे अस्तित्व संपते, तिचे मन ही लय पावते. अशा वेळी ती काडी जपून न ठेवता फेकलीच पाहीजे .
पण ही गोष्ट देवाच्या फोटोबाबत लागू होत नाही. घरात अनेक देवांचे फोटो आहेत मग त्यांना मन आहे का? असा देवाच्या गोष्टीत विचार करण्याची गरज नाही. तिथे मन आहे की नाही हे फक्त तो जाणतो

मी (प.पू.बापू) जो हा चष्मा वापरतो त्याला नेहमी प्रेमाने वापरतो, म्हणून त्या चष्म्याचे माझ्यावर प्रेम बसते. त्यामुळे तो मला कधीच injury करत नाही. जेव्हा स्त्री तिच्या घरातील सर्व व्यक्तींवर प्रेम करत असते तेव्हा तिला स्वयंपाक घरात कधीही सुरी लागत नाही, तिला injury होत नाही. पण तेच जेव्हा त्या स्त्रीचे तिच्या घरातील व्यक्तींवर प्रेम नसते तेव्हा तिला तीच सुरी बोचते, लागत असते.

मागे मी सांगितले होते accident म्हणजे काय? तुमच्या मनातल्या प्रत्येक विचारांचं एक मन असते

हा शर्ट जोपर्यंत मी अंगावर घातला आहे तोपर्यंत त्याला मन आहे. तो धुवायला टाकला की त्याचे मन लय पावते. प्रत्येक गोष्टीला मन आहे. मी लेखणीने लिहितो तिलाही मन आहे .

बर्‍याच जणांचे अक्षर घाणेरडे का असते? कारण त्यांचे त्यांच्या लिहिण्यावर प्रेम नसते म्हणून .
विद्यार्थीदशेत लिहिणं शिकत असताना जर घरून किंवा शाळेतून त्यास प्रेम मिळाले नसेल तर त्या विद्यार्थ्यास लिहिणे ही गोष्ट तिरस्काराची वाटते.

आज समजा अशी एखादी व्यक्ती ६० वर्षाची असेल आणि त्या व्यक्तीने ठरवले की आज बापूंनी सांगितले आहे त्याप्रमाणे वागून लिखाणावरही प्रेम करायचे तर त्या व्यक्तीला ह्या वयात तिचे अक्षर सुधारता येईल का? नक्कीच येईल.
अशा व्यक्तीने रोज महिनाभर देश भक्तीपर गीते, भावगीते लिहिली तर नक्कीच त्याच्या मनात लिहिताना प्रेम निर्माण होऊन त्याचे अक्षरही सुधारेल.

प्रत्येक ठिकाणी action-reaction घडत असतात ज्या ठिकाणी हे दिसत नाही तिथे मन नाही.

मनुष्य मरतो म्हणजे काय? मरताना प्राण जातो, प्राण गेला की त्यासोबत मनही जाते.

मानवाचे मन हे अतिशय विशाल असते. आमचे मन म्हणजे एक मोठा चुंबक आहे... जे जे काही आमच्या मनाच्या कक्षेत असते  ते ते सर्व आकर्षित करते, खेचून घेते.
लोहचुंबक लोखंडाला खेचून घेतो ही़ ताकद त्या लोखंडाची असते का? नाही तर त्या चुंबकाची असते. तसेच मनाचे असते.
मनाचे हे चुंबक कसे आहे? तर ते विविध मनाला आपल्याकडे खेचून घेत असते. म्हणजे नक्की काय? तर..
 
आमच्या मनात जेवढे चांगले तेवढया प्रमाणात आमचे मन त्याच्या क्षेत्रातील चांगल्या गोष्टींना खेचून घेणार.
आमच्या मनात जेवढे वाईट तेवढया प्रमाणात आमचे मन त्याच्या क्षेत्रातील वाईट गोष्टींना खेचून घेणार.
आमच्या मनात जेवढे दु;ख, pain तेवढया प्रमाणात आमचे मन त्याच्या क्षेत्रातील दु;ख, pain गोष्टींना खेचून घेणार. 

मग बापू आमच्या जीवनात अनेक दु:खे आहेत मग आमचे मनदेखील दु:खेच खेचून घेणार. 
त्यामुळे आमचे जीवन अधिक वाईट होणार का? हे सत्य आहे. चांगली माणसे अधिक suffer का होत असतात त्याचे हे कारण आपण आज बघतोय.

मला सांगा परमेश्वराने जीवन उत्पन्न का केले? त्या सच्चिदानंद परमात्म्याने जे काही उत्पन्न केले आहे ते तुम्ही दु:खी राहावे, क्लेश भोगावे म्हणून का? नाही... त्याने जग उत्पन्न केले मनुष्याला आनंद मिळावा म्हणून.
चण्डिकाकुल आज आमच्या जीवनात येऊन आम्हांला वाढवते आहे आमचे पोषण करते आहे ते आम्ही आनंदी रहावे म्हणून.

आम्ही दु:खी का असतो? नवरा बायको रस्त्याने चालत जात असताना नवरा दुसर्‍या बाईकडे वळून वळून बघत असतो तेव्हा जर त्या बायकोने त्या बाईला बोलावून सांगितले अग बाई ग बघ हा तुझ्याकडॆ बघतो आहे तर काय होईल मला सांगा? नवर्‍यानी तिथेच समजायचे आता संपले सगळे!! पण असे ती बायको नाही करत का? कारण भीती...
पुरुष जास्त लफडी का करतात? कारण भीतीच. मी एवढा strong आहे हे त्यांना prove करून दाखवायचे असते. स्त्रियांना पण मीच सगळ्यात सुंदर व attractive हे सांगायचे असते.

तुमच्या मनात हे भय तुलनेतून निर्माण होत असते. मानवाचे मन हे चुंबक आहे. जसं आमचे मन असते ते तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित करून घेत असते.

जर मनात आनंद असेल तर ते बाहेरूनही आनंदच खेचून घेणार जर मनात दु;ख असेल तर ते दु:खच खेचून घेणार.

बायको जास्त सुंदर असली की पुरुषांच्या मनात भय निर्माण होते. स्त्रियांच्या बाबतीतही तीच गोष्ट असते.
संशय हा नेहमी भीतीतूनच उत्पन्न होत असतो. अर्धे संसार ह्यामुळेच बिघडत असतात.

आमचे मन त्यात जे गुणधर्म आहेत त्यांनाच ते बाहेरुन आकर्षित करत असते. म्हणजेच जर आम्हांला सुख हवे असेल, आनंद हवा असेल तर आमचे मन हे सुखी व आनंदी असले पाहिजे.

पण आम्ही सामान्य माणसे आहोत. आमच्या जीवनात अनेक दु:खे असतात. सासू छळत असते, मुलं शिकत नसतात, नवरा त्रास देत असतो अशा अनेक गोष्टींना वेगवेगळ्या पातळीवर आम्हांला सामोरे जावे लागते... मग आम्ही नेहमी दु:खीच रहायचे का?

नाही... तर अशा वेळी तुमची जी काही सांसारिक परिस्थिती असेल त्यावर मात करुन तुंम्हाला आनंदी राहिले पाहिजे.

दुसर्‍याला चांगले देण्याने माणसाचा अहंकार पण तो चांगला अहंकार, आत्मविश्वास खूप strong होतो.
भले तुम्हांला सांसारिक दु:ख असले तरी त्याही परिस्थितीत तुम्हांला जेवढे चांगले वागता येईल तेवढे वागा. त्यातून तुमच्या मनात जो आनंद निर्माण होईल तो मग ह्या विश्वातला आनंद तुमच्याकडे खेचून घेईल.

जर हे असे करणे जमत नसेल आपण सामान्य माणसे आहोत दु:खामध्येही सुखी राहणे कठीण वाटू शकते तर मग अशा वेळी तो जो एक आहे, जो आंम्हाला फक्त आनंद द्यायला बसला आहे, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या कार्यात, सेवेत सहभागी होण्याचा प्रयत्न करा.

असे जेव्हा तुम्ही करता तेव्हा समजा तुमचे मन ४x४ आहे आणि त्यात खचाखच दु:ख भरले आहे तरीही तुम्ही त्याही परिस्थितीत त्या भगवंताचे स्मरण आनंदाने करत असाल, हा माझा भगवंत मला ह्या दु:खातून बाहेर काढणारच ह्या विश्वासाने कराल तर तुमचे दु:ख ४००० पट असेल तरी हा भगवंत तुमच्या मनाच्या ताकदीची उपेक्षा करून त्यात आनंद मिसळतो. म्हणजे जरी तुमच्या मनात दु:ख काठोकाठ भरले आहे अगदी बिलकुल जागा नाही आहे तरी तो त्यात हळूहळू आनंद मिसळतो आणि मग अशी स्थिती येते की दु:खाची भावनाच उरत नाही.
हे तो कसे करतो हे तुम्हांला कधीच कळू शकणार नाही. मग तुमच्या ज्या गोष्टी तुमच्या दु:खाचे कारण होत्या त्याच गोष्टी सुखाचे कारण बनतात. सासू प्रेम करू लागते, मुलं नीट अभ्यास करू लागतात, नवरा नीट वागतो.
सुंदरकांण्डात एक ऒवी आपण वाचतो...

प्रबिसि नगर कीजे सब काजा, ह्रुदय राखि कोसलपुर राजा
गरल सुधा रिपु करहिं मिताई,  गोपद सिंधु अनल सितलाई,

लंकिनी महाबली हनुमंतास सांगते, तुझ्या अंत:करणात प्रभू रामचंद्रांना ठेवून काहीही काम कर मग विषच अमृताचे काम करेल.

सद्‌गुरुतत्त्व काय करते तर विषचाचेच अमृत बनवते. जो शत्रू असतो तोच मित्र बनतो. जे काही कोणी तुमच्यासाठी वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल तेच तुमच्या फायद्याचे ठरते.

तो तुमच्यासाठी जे जे काही अहितकारक आहे ते ते हितकारक बनवतो. पण कधी? प्रबिसि नगर कीजे सब काजा... हा जो राम आहे त्याला हृदयात धारण केले तरच.

श्री साईसच्चरीतात हेमाडपंत सांगतात.. "राम कृष्ण साई, तिघांमाजी अंतर नाही"
हा तो एकच आहे व ह्याचे एकत्व माणसासाठी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. तो एकच होता, एकच आहे आणि एकच असणार म्हणजे नक्की काय?
 
चण्डिकाकुलात आदिमाता, दत्तात्रेय, हनुमंत, किरातरुद्र, माता शिवगंगागौरी व हा परमात्मा आहे. ह्यांची नाती आज बापूंनी आम्हांला सांगितली म्हणून माहिती आहेत बरोबर. पण इथे एक लक्षात घ्या ह्या चण्डिकाकुलामधील एक परमात्मा सोडून कुणीही कधीही मानव बनून येत नाही.

मानव बनतो तो हा एकच... तोच राम तोच कृष्ण तोच साई बनून येतो... भले मग त्याला कितीही त्रास होवो आपल्या लेकरांवर असलेल्या अनन्य प्रेमापोटी हा १०८% पूर्णपणे माणूसच बनून आलेला असतो. ही गोष्ट सोपी नाही आहे लक्षात ठेवा.

समजा तुम्ही बंगल्यात राहता तुमच्याकडे सगळी ऎश्वर्ये आहेत आणि तुम्हांला १ महिना चाळीत रहायला सांगितले तर तुम्हांला शक्य होईल का? नाही.

समजा तुम्हांला सांगितले तुम्ही पहिलीपासून आजपर्यंत जे काही शिकलात त्या ज्ञानाचा एक पूर्ण दिवस जराही वापर करायचा नाही... शक्य होईल का? नाही.

फक्त तो एकच सर्व क्षमता असूनही पूर्णपणे मानव बनून येतो आमच्यासाठी.
आमच्यावरील प्रेमापोटी तो जन्ममृत्यूचा अटळ सिध्दांत त्यालाही जराही लागू होत नसताना तो स्वीकारतो .
हा एकच असा आहे जर हा मानव बनला नाही तर हा कर्माचा अटळ सिद्धांत त्याला लागू होणार नाही. पण आपल्या लेकरांच्या प्रेमापोटी, मी त्यांच्यापासून दूर राहू शकणार नाही ह्या त्याच्या इच्छेपोटी तो परत परत मानव म्हणून जन्म घेतो.
पतीपत्नी आहेत समजा त्यातील एकाला दु:ख झाले तर तेव्हा दुसर्‍याने त्याला लांब उभे राहून मोठे प्रवचन दिले तर त्याला बरे वाटणार आहे का? नाही तेच जर त्याने जवळ जाऊन पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला तर नक्कीच त्याला आधार वाटणार .

हीच आपुलकी ही जवळीक आपल्या लेकरांना देण्यासाठी तो हे सर्व स्वीकारतो. आपल्या लेकरांप्रमाणेच एक बनून तो येतो त्यांच्यासोबत हसतो-बोलतो, काम करतो. असा सर्वसमर्थ असूनही कर्माचा अटळ सिध्दांत स्वीकारणारा तो एकच .

गुरु म्हणजे काय? तर ज्याला काही गरज नसताना, स्वत:चे सामर्थ्य न वापरता, जे त्याला जराही लागू होत नाहीत ते सर्व नियम तो स्वीकारतो... तोच एकच गुरु.

गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तर माझे माझ्या गुरुशी असणारे नाते. क्षेत्र म्हणजे शेत व शेत कोणाला पिकवावे लागते तर स्वत:लाच.

तो एकच जो आहे तो का अवतरीत होतो? हे जे क्षेत्र जे माणसाला स्वत:ला पिकवावे लागते ते तो म्हणतो मला द्या, तुमचे क्लेश तुम्ही मला दिले तर त्यात नांगरणीही तोच करतो व पिकवतोही तोच. तो एकच हे करु शकतो कोणासाठी? तुमच्यासाठी.

स्थूलरूपाने जेव्हा आम्ही गुरुक्षेत्रम्‌मध्ये जातो तेव्हा तिथे आल्यावर आमचे मन जरी दु:खाने भरले असले तरी तिथे दु:खाला attract  करण्याच्या आड येतो तो गुरु. सच्चिदानंद असणारा हा परमात्मा तुमच्यावर सत आणि चित ह्याची जबाबदारी टाकत नाही तर direct  तुम्हाला आनंद देतो . 

आई व गुरु ह्या शब्दांमध्ये किती प्रेम आहे माझ्याएवढे कुणीही अनुभवलेले नाही. ते अनुभवणारा कुणीतरी दुसराही असावा असे मला मनापासून वाटते पण अजूनपर्यंत कोणी असा मायेचा पूत निघाला नाही.
हे गुरु आणि आईचे प्रेम तुम्ही प्रत्येकाने अनुभवावे अशी माझी मनापासून इच्छा आहे,
माझ्या गुरुंची एक गोष्ट तुम्हांला सांगतो.

माझे नित्यगुरु श्री मकरंद स्वामी ह्यांनी त्यांच्या निर्वाणाच्या वेळी सर्वांना जे जे काही त्यांच्याकडे होते ते वाटले. पण त्यांच्या लाडक्या अनिरुद्धासाठी त्यांनी काय ठेवले? तर शेवट्च्या क्षणी त्यांनी वापरलेलेल शूज. गुरुने जग सोडण्याआधी आपल्या पायातल्या वहाणा काढून देणे ह्यासारखी मोठी गोष्ट दुसरी काय असू शकेल/काहीच नाही. आजही ते शूज बघून माझ्या गुरुचे प्रेम आठवून मला रोंमांच उठतात.

तो एकच असतो म्हणून त्याचा नित्यगुरुही एकच असतो हे लक्षात ठेवा.
गुरु व गुरुचे प्रेम हे तुमच्या कल्पनांमध्ये कधीच बसू शकणार नाही. गुरुची ताकद किती आहे हे तुम्ही कधीच जाणू शकणार नाही.

"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऎसा..."
एवढा strong विश्वास आमचा असला पाहिजे. असे जेव्हा असेल तेव्हा आमच्या सर्व गरजा कुठेही भीक न मागावी लागता पूर्ण होतील

"सर्व सुखाचे साधन बाप रखुमादेवीवरु"
नेहमी ह्या दोघांमध्ये एकाचा रंग गोरा असतो तर एकाचा काळा पण विठ्ठल रखुमाबाई हे एकच असे जोडपे आहे की ज्यात ह्या दोघांचाही रंग काळाच आहे... व त्या पुंडलिकाचा रंगही काळाच आहे... हे कुणासाठी तर आमच्यासाठी.

परत एकदा सगळ्यांनी मोठ्याने म्हणा हे कुणासाठी तर आमच्यासाठी.
कुणासाठी तर आमच्यासाठी...

॥ हरी ॐ॥
#K10
अंबज्ञ..
जय श्रीराम
जय जगदंब जय दुर्गे..
नाथसंविध्..

Source: aniruddhabapu.in

No comments:

Post a Comment