Sunday, September 5, 2021

Saibaba information of 74 devotees

श्री साईबाबांच्या अवतारीत जीवनामध्ये एकूण ७४ व्यक्ती आल्यात व त्यांना त्यांच्या काळात बाबांचा सहवास व सानिध्य लाभले व बाबांचा कृपाशीर्वाद लाभला.

१) चांद पाटील -बाबांनी याला अलौकिक सामर्थ्याने अग्नि व पाणी निर्माण करून चिलीम पेटवून दिली.हरवलेली घोडी सापडून दिली. त्याच्या घरादाराचा पत्ता नसताही त्याचे घरी वास्तव्य केले व त्याची भरभराट केली.

२) म्हाळसापती यांना बाबांनी खंडोबाचे देवळात प्रथम दर्शन दिले. चावडीत व मशिदीत स्वतःबरोबर झोपायला दिले. साईबाबा हेच गुरु कळल्यावर अंतरीचे गुह्य म्हाळसापतींनाच सांगून बाबांनी विश्वासाने ३ दिवस ब्रह्मांडी प्राण नेऊन ठेवला व आपल्या प्राणाचे म्हाळसापतींकडून रक्षण करवून घेतले व त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग शिकविला. आपल्या भक्तांच्या नवरत्न मालिकेत यांना अग्रस्थान दिले. पूजेचा मान दिला व स्वतःच्या कंठाला गंध लावू दिले.

३) माधवराव देशपांडे हा बाबांचा लाडका श्यामा. सख्य भक्तीचे उत्तम उदाहरण. मास्तरची नोकरी सोडावयास लावून जनसेवेचे व्रत दिले. विष्णूसहस्त्र-नामाची पोथी दिली. भयंकर सर्प विषापासून संरक्षण केले. काशी, प्रयाग यात्रा श्रीमंती थाटात घडवून आणल्या. आत्मज्ञान प्राप्ती करून दिली. यांना भक्त श्रेष्ठ मालिकेत महत्त्वाचे स्थान दिले व फार प्रेम केले.

४) तात्या कोते हे बाबांचे मामाच बनले. छोट्या तात्याला स्वतः बरोबर चावडीत, मशिदीत झोपायची परवानगी दिली. मशिदीचा जीर्णोद्धार करून घेतला. तात्याच्या पाटीलकीच्या अहंकाराचे दहन केले. त्यांच्या जरीचा शिरपेच मस्तकी बांधला. यांचे अत्यंत लाड केले. आईला बायजाबाईला दिलेल्या वचनाप्रमाणे स्वतःचे प्राण देऊन तात्याला दीर्घायुषी केले. दोन वेळा घोर अपघातातून वाचवले.भक्तश्रेष्ठ मालिकेतील हाही एक हिराच होय.

५) काकासाहेब दिक्षित ही एक महत्वपूर्ण व्यक्ती व  बाबांनी दीक्षित नाव अमर राहावे म्हणून दीक्षित वाडा बांधून घेतला. बोकडाचा वध करण्याच्या निमित्ताने गुरूभक्ती करण्यास लावली.लक्षाधिशाला भिक्षाधीश बनविले पण पूर्ण मनःशांती देऊन 'तुला विमानातून नेईन' या दिलेल्या वचनाप्रमाणे खरोखरच नेले. भक्तश्रेष्ठ मालिकेत उच्च स्थानाला यांना नेऊन बसविले.

६) संत कवी दासगणू महाराज यांना पोलीसची नोकरी सोडायला लावली. संतचरित्रे लिहवून घेतली.स्वतःच्या अंगुष्ट द्वयातून गंगायमुना निर्माण करून प्रयाग तीर्थाचे स्थान घडविले.विठ्ठलरूपात दर्शन दिले. श्री दासगणू महाराज यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत श्रीरामनवमी उत्सव करवून घेतला. ईशावास्याचे कोडे मोलकरणी करवी उलगडून सर्वांभूती मीच वास करून आहे याचा साक्षात्कार घडवला. या श्रेष्ठ भक्तात उच्च स्थान दिले, व अपरंपार प्रेम केले. बाबा इतरांवर राग धरीत पण गणूंवर उत्कट प्रेम केले. उंची पोषाखाबद्दल कानउघाडणी करून नारदीय कीर्तन पद्धतीने कीर्तने करावयास प्रवृत्त केले.

७) गोविंदराव दाभोलकर यांना 'हेमाडपंत' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.अत्यंत मुत्सद्याची उपमा बाबांनी यांना देऊन स्वतःचा 'श्रीसाईसच्चरित' हा ग्रंथ लिहून घेतला. अनेकवेळा रक्षण केले. आपला अखंड सहवास देऊन सेवा करून घेतली. यांना भक्तश्रेष्ठीत उच्च स्थान
दिले. होळीपौर्णिमेच्या दिवशी छबी रूपाने गृहप्रवेश केला व अनुग्रह केला.

८) काकासाहेब महाजनी-यांना बाबांनी रामनवमी उत्सवाची प्रेरणा दिली.एकनाथी भागवत वाचावयास लावले. आपल्या सेवेची संधी दिली. अखंड सहवास दिला. 'श्रीसाईलीला' मासिकाचे संपादकत्व स्वीकारण्याची प्रेरणा देऊन ते कार्य
करून घेतले. भक्त श्रेष्ठात उच्च स्थानी त्यांना बसविले.

९) नानासाहेब चांदोरकर-यांना बाबांनी निरोपावर निरोप पाठवून शिरडीत खेचून आणले, खूप सेवा करून घेतली. जनसेवेची प्रेरणा दिली. अस्सल रजपूत वेष घेऊन टांगा, घोडा निर्माण करून त्यांच्या कन्येचे बाबांनी रक्षण केले. गीतेचे निरूपण स्वतः करून त्यांना आत्मबोध केला. मन विचलीत होऊ लागताच ते ताळ्यावर आणले. श्रेष्ठ भक्तात उच्च स्थान दिले. शिरडीत लोकांना अन्नपाणी, वाहन मिळण्यासाठी पुतण्याकडून सेवा करण्याची प्रेरणा दिली.

१०) बापूसाहेब बुटी हा कोट्याधीश माणूस असूनही साध्या निरोपासाठी कामे करून घेतली. त्यांचेकडून टोलेजंग वाडा बांधून घेतला. अनेक व्याधी निर्माण झाल्या असता, प्रसंगी सर्परूपाने काळ जवळ आला असता त्यांचे रक्षण केले.
अखंड सहवास दिला. प्रेम केले. उच्च स्थानी भक्त मालिकेत बसविले.

११) मेघा हा पोर वयाचा गुजराथी ब्राह्मण होता त्याची शंकरभक्ती जाणून त्याला  आत्मलिंग दिले.त्रिशूल काढायची आज्ञा दिली. शिरडीतील सर्व देवांची पूजा करून घेतली एका पायावर उभा राहून आरती करण्याची इच्छा बाबांनी पुरवली. संक्रांतीचे वेळी सचैल स्नान घालण्यास त्यास अनुमती दिली. भक्तांच्या मालिकेत उच्चस्थानी ठेवले.मेघाचा मृत्यू होताच स्वतः रडलेच पण त्याचे शव फुलांनी शृंगारले. त्याचेवर निस्सीम प्रेम केले.

१२) बायजावाई ही तात्याची आई मानलेली होती व बाबांची मामी. रानोमाळ हिंडून श्रीबाबांना भाकरी भरवी. तिचे हाल चुकवण्यासाठी मशिदीत राहू लागले. तिच्या हातची भाकर खाऊ लागले. इतरांवर रागावणारे बाबा बायजाबाईच्या आज्ञेत वागत. तिच्यावर आईप्रमाणे माया केली. तात्याचे रक्षण करण्याचे दिलेले वचन स्वतःचा प्राण देऊन पूर्ण केले.

१३) राधाकृष्णा आई हिने मीरेसारखी बाबांची  भक्ती केली.तिला उत्सव सुरू करण्याची प्रेरणा दिली. अज्ञात राहून सेवा करण्याची इच्छा पूर्ण केली. बाबांचे उष्टे खाण्याची इच्छाही पूर्ण केली. तिने मिरवणुकीचे सर्व साहित्य तयार केले उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य पण तयार करण्याची तिची इच्छा पूर्ण केली.

१४) लक्ष्मीबाई शिंदे हिने प्रेमाने सेवा करून दिली. रोज २ वेळा तिच्या हातची भाकर खाल्ली. शेवया खाल्ल्या. तिची निरागस भक्ती पाहून तिला चांदीचे ९ रुपये मरणसमयी दिले व नवविधा भक्तीची माळ तिच्या गळ्यात घातली.

१५) बाळासाहेब देव यांना संन्यासाचे वेषाने दोन गृहस्थ बरोबर घेऊन देवांचे घरी भोजन करून त्यांची इच्छा तृप्ती केली. ज्ञानेश्वरी वाचनाचे मार्गदर्शन करून मार्गाला लावले.
श्रीसाईसच्चरिताची अवतरणिका लिहावयाची प्रेरणा दिली. भक्तमालिकेत मानाचे स्थान दिले.

१६) बापूसाहेब जोग यांना बाबांनी  रोजची दुपारची आरती करावयाची कामगिरी दिली. चावडी सुधारणा करून घेतली. वैराग्य प्राप्त होण्याची इच्छा पूर्ण करून साकुरीस वास्तव्य करावयास लावले. भक्तमालिकेत उच्च स्थान दिले.

१७) काशीराम शिंपी यांचा भोळा भक्तीभाव पाहून बाबा याचेवर संतुष्ट होते. अहंकाराचा नाश केला. अतीव श्रद्धेचे फळ म्हणून चोरट्यांपासून रक्षण केले व मानाची तलवार मिळवून दिली. बाबांनी काशीरामाने शिवलेले कपडेही काही वेळ घातले.

१८) भागोजी शिंदे हा महाव्याधीग्रस्त असून  सुद्धा त्याचे कडूनच  बाबानी आपली सेवा करून घेतली. हाताला तेल लावणे, लेंडीबागेपर्यंत बरोबर टमरेल घेऊन जाणे.बाबांवर छत्री धरणे ही सेवा करून घेता घेता त्याची व्याधी बरी केली. भक्त श्रेष्टात उच्च स्थान.

१९) रा. ब. मोरेश्वर प्रधान ह्यांना बाबांनी स्वतःच्या सहवासात राहू दिले. सेवा करू दिली. लेंडीबागेत आमूलाग्र बदल करून ती सुंदर बनविण्याची प्रेरणा दिली. भक्त श्रेष्ठात उच्च स्थान यांना बाबांनी दिले.

२०) रा. व. साठे यांना बाबांनी लग्न करावयास लावले. पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद गुरुचरित्राचे दोन सप्ताह पूर्ण होताच अनुग्रह केला. लोकांच्या सोयीसाठी आणि साठ्याचे नाव चिरंजीव होण्यासाठी वाडा बांधण्याची प्रेरणा दिली.

२१) दादा केळकर हे एक म्हातारे निःस्सीम मक्त. कट्टे ब्राह्मण पण  होते. यांना सागुती आणण्याची आज्ञा करून परीक्षा घेतली. पंडीतांचे निमित्त करून आपण ब्राम्हण च आहोत हे पटवून दिले. पूर्ण मनःशांती देऊन सेवा करून घेतली. श्रेष्ठ भक्तमालिकेत स्थान. गुरुपूजा करण्याची प्रेरणा दिली.

२२) तात्यासाहेब नूलकर ह्यांनी स्वतःची सेवा करून घेता घेता लोकांची सेवा करून घेतली. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी स्वस्वरुप दाखवून साईमय केले. भक्तमालिकेत उच्च स्थानी बसविले. गुरुपूजेचा मान दिला.

२३) नानासाहेब निमोणकर यांनी बाबांची  सेवा करून घेता घेता इतरांची सेवा करून घेतली. अखंड सहवास दिला. प्रेम केले. भक्तमालिकेत उच्च स्थानी नेऊन बसवले. निशाणाचा मान अव्याहत चालू आहे.

२४) गोपाळ गुंड यांची बाबांनी यांची पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करून शनिदेवाच्या देवळाचा जीर्णोद्धार करावयाची आज्ञा. उरूस व रामनवमी एकाच वेळी
साजरा करण्याची प्रेरणा यांना दिली.

२५) हरिश्चंद्र पितळे ह्यांच्या अपस्मार व्यथित मुलाला बरे केले. चांदीचे ३ रुपये देऊन श्रीस्वामीसमर्थ अक्कलकोट यांच्या भक्तीचे पुनरुज्जीवन केले.

२६) बाळा पाटील नेवासकर हे दूर राहून भक्ती करीत असताना  श्री बाबांचे स्नानाचे पाणी पिऊन राहाणे. सर्व उत्पन्न बाबांच्या चरणी. भक्तीभाव पाहून प्रथम वर्ष श्राद्धदिनी अब्रूचे रक्षण केले. कुटुंबावर माया केली. भुजंग रूपात दर्शन दिले. भक्त मालिकेत उच्च दर्जाचे स्थान.

२७) डॉ. पिल्ले यांना नारू रोगापासून मुक्त केले. अपरंपार माया केली. अखंड सहवास दिला. भक्तश्रेष्टात उच्च स्थान दिले.

२८) डॉ. पंडित यांच्या कडून स्वतःला गंध लाऊन देऊन पूजा करून घेतली. त्यांचे गुरु काका महाराज पुराणिक धोपेश्वरकर यांचे रूपात दर्शन दिले.

२९) रामदासी ह्यांना बाबांनी अध्यात्मरामायणाची दीक्षा दिली. विष्णूसहस्त्रनामाची पोथी पंचरानी गीता दिली.

३०) दादासाहेब खापर्डे यांच्या मुलाच्या ग्रंथी उटल्या होत्या. त्यांची पत्नी रडू लागताच अभय देऊन ते दुखणे आपले अंगावर घेतले. पती-पत्नींचा स्वतःभोवतीचा दृढभाव पाहून त्यांचेवर अनुग्रह केला. पत्नीला 'राजाराम राजाराम' असे नामस्मरण करावयास सांगितले.

३१) लाला लखमीचंद यांना छबी रूपाने दर्शन दिले नंतर शिरडी यात्रा घडवली.प्रत्यक्ष दर्शन दिलेच. सांजा भरपूर खायची इच्छा तृप्त करून पाठ, कंबर पोट यात उठणारा शूल नाहीसा केला.

३२) सखाराम औरंगाबादकरांची पत्नी-सबंध महिनाभर तिष्ठत ठेऊन तिची परीक्षा घेतली. भोळा व दृढ भाव पाहून तिची पुत्रकामना पूर्ण केली.

३३) वकील सपटणेकर यांचेवर बाह्याकारी क्रोध दाखवून अंतर्यामी प्रेम ठेऊन यांना बाबांनी दर्शन दिले. पुत्रकामना पूर्ण केली. संपूर्ण मनःशांती दिली.

३४) अप्पा कुलकर्णी हे  सरकारी कामात तोहमत येईल या भीतीने घाबरले असताना पूर्ण अभय देऊन नेवाशास मोहिनी राजाचे दर्शन घ्यावयास लावले व रक्षण केले आणि पूर्ण मनःशांती दिली.

३५) दामूअण्णा कासार यांची पुत्र संततीची आस पूर्ण केली. व्यापारात नुकसान होणार होते. ते वेळीच इशारा देऊन निवारले. निशाणाचा मान दिला.

३६) तेंडुलकर पुत्र हे डॉक्टरी परीक्षेत नापास होणार या भयाने बसत नव्हता,पूर्ण आश्वासन देऊन बसविले व यश प्राप्ती करून दिली.

३७)  गरीब चोळकराच्या नवसाला बाबा पावले. नोकरी कायम झाली. बिनसाखरेचा चहा पिणाऱ्या (साखर वर्ज्य करणाऱ्या) चोळकरांचे अंतर्ज्ञानाने मनोगत जाणून पूर्ण करून गोड साखरेचा चहा प्यावयास लावून पूर्ण अनुग्रह केला.

३८) रतनजी पारशी यांची पुत्रकामना पूर्ण केली.नांदेडचे मौल्वीसाहेब व आपण एकच अशी प्रचिती त्यांना आणून दिली

३९) मुळे शास्त्री हे षट्शास्त्रात निपुण असलेल्या शास्त्रीबुवांना हात न दाखवता घोलकर स्वामींच्या रूपात दर्शन देऊन आम्ही दोघे एकच ही प्रचिती दिलीच पण सोवळे ओवळे धर्म जाती यांच्याबद्दलचा भेदभाव नष्ट केला.अहंकार दवडला,

४०) काका वैद्य हे वणी देवीचे उपासक होते. जिकडे तिकडे फिरून मनःशांती लाभेना तेव्हा श्यामाकरवी शिर्डीस आणून आपले सहवासास ठेवून पूर्ण अनुग्रह केला व मनःशांती दिली.

४२) उपासनी महाराज यांना  शिर्डीत खंडोबाचे देवळात कडक तपश्चर्या करावयास लावून, अनेक प्रकारे परीक्षा घेऊन आत्मज्ञान दिले. साकुरीस आश्रम उभारण्याची प्रेरणा. स्वतःचे और्वदैहिक त्यांचेकडूनच करून घेतले.

४२) खुशालचंद यांचेवर पुत्रवत प्रेम केले. मनास आले की राहात्यास जाऊन भेट घेत किंवा येण्यासाठी दृष्टांत देत असत.

४३) अण्णा चिंचणीकर हे स्पष्टवक्ता पण अंतर्यामी प्रेमळ, श्रद्धाळू साईपदी अनन्यभाव. त्यामुळे फार प्रेमाचा वर्षाव. चावडीच्या रूपाने अमरपद प्राप्त. भक्त मालिकेत श्रेष्ठ.

४४) धरमसी जेठाभाई ययांची सबीज द्राक्षे निर्बीज करून दाखवली. मनातले सर्व विचार अंतर्ज्ञानाने ओळखून त्यांच्या चंचल चित्ताला स्थिरता आणली.

४५) तुकाराम कोकाटे यांचेकडून श्रीबाबांनी पाणी  तापवून घेतले.त्यांना दुसरा कोणी चालत नसे. त्याचेकडून सेवा करून घेतली व त्याचेवर प्रेमाचा वर्षाव केला.

४६) मद्रासीबाई हीची सुंदर भजने गावयाची इच्छा पूर्ण करून रामरूपात दर्शन देऊन धन्य केले.

४७) तिचा पतीचा अहंकार घालवला, लोकापासून परावृत्त केले. दृष्टांत देऊन मुसलमानाच्या दैवताचे पूजन त्याचे घरी होते हे दाखवून दिले व रामदासांचे रूपात दर्शन दिले.

४८) बाबासाहेब तर्खड यांना बाबांनी अखंड सहवास दिला.पत्नीचा व पुत्राचा दृढभाव पाहून कृपादृष्टी केली. बंद दरवाजातून प्रवेश करून कोणतेही रूप घेता येते हे दाखवून दिले.

४९) बेरे यांची चोरटे प्रवासात लुटतील या भीतीने त्यांना अभय देऊन त्यांचे चोरट्यांपासून रक्षण केले व सुखरूप पोचवले.

५०) बाळावुवा सातारकर यांना एका रामनवमीला कीर्तनाला पाचारण करण्याची काकासाहेबांना प्रेरणा देऊन शिर्डीत आणवले. विठ्ठलरूपात दर्शन देऊन ५०० रु बिदागी देऊन अनुग्रह केला.

५१) शेवडे यांना आपले पदीची निष्ठा आठवून त्यांना परीक्षेत पास केले. पूर्ण अनुग्रह केला.

५२) विजयानंद हे मद्रासी संन्यासी होते ते मानस सरोवराला जात असता त्याचा मरणकाळ ओळखून आपले जवळ ठेवून त्याला मुक्ती दिली.

५३) (बापूगीर) रामगीर यांना बाबा बापूगीर या  नावाने प्रेमाने हाक मारीत असे. त्यांना नानासाहेबांकडे आरती व अंगारा घेऊन पाठवले. प्रवासाची उत्तम सोय केली. स्वतः टांगेवाला होऊन टांग्यातून प्रवास घडविला.

५४) बाळाराम मानकर यांना  मच्छिद्रगडावर जाऊन राहाण्यास आज्ञा दिली.तेथे ध्यानधारणा करून घेतली.प्रत्यक्ष दर्शन देऊन मनःशांती दिली. परतीच्या प्रवासात कुणबी वेषाने तिकीट ही आणून दिले.

५५) भीमाजी पाटील यांचा कपक्षयाचा विकार पूर्ण बरा करून त्याला भक्तीची प्रेरणा दिली.

५६) अब्दुल्ला यांचेकडून दीपोत्सवाची सेवा करून मशिदीत दिवे लावले. त्यांनी बाबांची सेवा केली त्यांच्या मुलाचा विवाह करून दिला. अब्दुल्लावर पुत्रवत प्रेम केले. त्याचा वंशवेल बहरून टाकला.

५७) बडे बाबा हे मनाने चांगले नसताही बाबांनी फार प्रेम केले.स्वतःजवळ बसवून जेवू घातले. रोज ५०-५५ रु. काढून दिले.

५८) रोहिला हा मशिदीत रात्रंदिवस कलमे पढत असे. मोठमोठ्याने ओरडे,लोक कंटाळले पण अल्लाचे नाव घेणाऱ्या रोहिल्यावर बाबांनी प्रेम करून त्याला अभय दिले.

५९) आंग्ल गृहस्थ ह्याला दूर ठेऊन का होईना येशू रूपात दर्शन दिले व अपघातात जबर जखमी झाला असता प्राण वाचवले. हिंदू लोकांविषयी जिव्हाळा व प्रेम निर्माण केले

६०) कॅप्टन हाटे ह्याला स्वप्नात दृष्टांत देऊन वालपापडीच्या शेंगा खाण्याची इच्छा प्रकट केली भक्तीभावाने अर्पण केलेला रुपया परत देऊन भक्ती दृढ केली.

६१) बहाणपूरची स्त्री हिला स्वप्नात दृष्टांत देऊन खिचडीची मागणी केली काही दिवस परीक्षा घेऊन तिची खिचडी सेवन करून तिला कृतार्थ केले.

६२) राधाबाई देशमुख हीने बाबांनी मंत्र द्यावा म्हणून ३ दिवस उपोषण केले तिची समजूत घालून उपाशीपोटी केलेली भक्ती देवाला प्रिय होत नाही असे सांगितले.गुरूने मागितलेले 'श्रद्धा व सबुरी' हे २ पैसे मी गुरूला दिले. माझ्या गुरूनी मला मंत्र दिला नाही. तेव्हा तुला कोठून देऊ अशी समजूत करून तिच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. पूर्ण अनुग्रह केला.

६३) गोखले बाई हिने होळीच्या सणाला उपाशी राहून बाबा पावावेत म्हणून हट्ट करण्याचा गोखलेबाईना दादा केळकरांकडे पुरणपोळ्या करून सर्वांना वाढून स्वतःला यथेच्छ जेऊ घातले व पूर्ण अनुग्रह केला.

६४) आनंदराव पाखाडे ह्याला स्वप्नात दृष्टांत दिला. दर्शन दिले व श्यामरावाला रेशीमकाठी धोतर द्यावयास लावले.

६५) बाळाराम धुरंधर या विनयशील गृहस्थांना विठ्ठल रूपात दर्शन देऊन चिलीम ओढायची सवय नसता ती ओढावयास लावून त्यांचा दम्याचा विकार घालवला.

६६) अमीर शक्कर ह्याची वातविकारापासून मुक्तता केली.आशाभंग करताच थोडीशी शिक्षा केली. परंतु संपूर्ण रोग घालवून विखारापासून रक्षण केले.

६७) रघुनाथराव तेंडुलकर याला इमानीपणाने नोकरी केल्याचे बक्षीस म्हणून स्वप्नांत दृष्टांत देऊन योग्य ती पेन्शन देवविली व योगक्षेमाची काळजी दूर केली.

६८) आळंदीचे स्वामी हे कर्णरोगाने पिडीत होऊन व्यथित होऊन शिरडीत आले तेव्हा त्यांचा कर्ण रोग बाबांनी बरा केला,

६९) दत्तोपंत यांचा १४ वर्षे जुना पोटशूळ केवळ दृष्टीने  बरा करून त्यांना मनःशांती दिली.

७०) मालेगावचे डॉक्टर यांच्या पुतण्याचा हाड्यावर्ण ऑपरेशनने बरा होईना तो उदीने व कृपाशीर्वादाने बरा करून डॉक्टरांना भक्ती मार्गाला लावले.

७१) वांद्रे येथील एका गृहस्थ होता त्याचे मृत पिता रात्री पीडा देऊन झोपू देत नसे.उदी लावून व उशाला घेऊन झोपताच त्या गृहस्थाला निद्रा मिळू लागली. मनःशांती लाभली.

७२) रामचंद्र पाटील हे दुखण्याने बेजार झाले असता स्वतः बिछान्यावर वसून अभय दिले व त्यांना बरे केले. यांचे करारी स्वभावाने श्रीबाबांचे शरीर बुटी
वाड्यात विसावले आहे ही ही साइचीच प्रेरणा.

७३) नांदेडचे पुंडलीकराव यांना श्रीवासुदेवानंद सरस्वतीनी दिलेला नारळ (श्रीबाबांना) चुकुन फोडला. म्हणून दुःखित झाले पण तो माझ्या संकल्पानेच फुटला ही त्याला  समजूत दिली.

७४) भक्त पंत हे  शिरडीस दर्शनास येण्याची टाळाटाळ करीत होते.  त्यांची  स्वतःच्या गुरुवर निष्ठा होती. एकदा त्यांना फीट येवून बेशुद्ध होताच  केवळ बाबांच्या उदी व तीर्थाने शुद्धीवर येतात. स्वतःच्या पायी भाव ठेवण्याची आज्ञा होते.

No comments:

Post a Comment